नवोदितांची प्रतिभा बारूद, लेखण बंदूक व्हावी - ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे

लोकनेता न्युज नेटवर्क

लातूर :-  स्थानिक सम्राट अशोक साहित्य व सांस्कृतिक मंच, महाराष्ट्र तर्फे बुद्ध जयंती पर्वावर आयोजित नवोदितांचे कवी संमेलन तथा मंचाचे संस्थापक अध्यक्ष कवी प्रमोद उबाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे अभिष्टचिंतन अशा विविधांगी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून दि . १८-०५-२०२५ रोजी बोलताना नवोदित कवींना दिलखुलासपणे व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या अन् त्यामुळेच आगळेवेगळे ठरलेल्या या बहुरंगी कवी संमेलनाने महाराष्ट्रभर साहित्य जगतात विशिष्ट ठसा उमटवल्याचे सांगून नवोदितांनी आपल्या लेखणीतून प्रबोधन व सामाजिक परिवर्तन घडवून कसे आणता येईल, हा विचार मनात ठेवून निर्भिडपणे लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण सध्याच्या साधारण माणसाच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या परिस्थिती मधे विश्वासाचे वातावरण स्थापित करण्याचे मोलाचे कार्य साहित्यिका शिवाय कुणी करू शकणार नाही यावर भाष्य करताना, अंतर्राष्ट्रीय स्तरावर गाजलेले ज्येष्ठ व बहुभाषिक कवी तथा हरहुन्नरी कलावंत डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी --- नवोदितांची प्रतिभा बारूद, लेखण बंदूक व्हावी !
तोफांतून अंगार तशी,
शब्दांची फैर झडावी !!
--- अशा लाव्ह्यागत तप्त 
वक्तृत्वातून नवोदितांना जणू साकडेच घातले. तथागत गौतम बुद्ध तथा महामानवाच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन होवून प्रा. शिवशरण हावळे सरांच्या हस्ते उदघाटन झालेल्या या कवी संमेलनात प्रमुख अतिथी या नात्याने सुप्रसिद्ध कथाकार व ज्येष्ठ कवी डॉ. बबनराव महामुने, छ. संभाजीनगर यांनी कथेसह कविता तसेच डॉ. डी. व्ही. खरात, चिखली, भावकवी अंकुश पडघान, चिखली तथा कवी लेखक मा. रमेश हणमंते, प्रा. पी. एस्. बनसोडे, लातूर, स्वागताध्यक्ष तथा ज्येष्ठ लेखक कवी मा. दयानंद सिरसाठे यांनी आपल्या भाषणातून कविते सह प्रबोधन केले.
मा. प्रमोद उबाळे यांच्या प्रास्ताविक व ॲड. उमाकांत आदमाने यांच्या सुंदर सूत्रसंचालनांतर्गत संपन्न झालेल्या या कवी संमेलनात वालेकर सरांची बाप, प्रा. रमा भंडारी यांची तथागत, सोनाली आळंदीकरांची परंपरेला आव्हान, योगेश ताटे यांची माणूसकी, जयश्री चव्हाण यांची मुखवटे चेहऱ्याचे, पल्लवी बनसोडे यांची कामगार आई, तेहसीन सय्यद यांची स्त्री, माळी सरांची माझी मुलगी, प्रा. कल्याण राऊत यांची भारूड तर प्रमोद उबाळे यांच्या भीमराव या प्रभावी कवितांबरोबरच प्रदीप कांबळे, भुरे सर, सुरेखा भालेराव, ॲड. शिंदे इ. सह अनेक नवोदित कवींनी आपापल्या रचना सादर करून प्रबोधन केले. एकूणच या संमेलनाने त्यांना,

हे अंबर आपुले आहे 
आभाळ आपुले आहे !
लिहिणारांच्या लेखणीला 
अंतराळ आपुले आहे !!

असा अंतर्गत उर्जेचा संदेश दिल्याचे दिसले. आयोजकांच्या वतीने सर्व सहभागी मान्यवरांचा सत्कार करून त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील कवींनी या संमेलनात सहभाग नोंदविला.
_______________________

0/Post a Comment/Comments