लोकनेता न्युज नेटवर्क
पालघर (सतेद्र मातेरा) :- पालघर जिल्ह्यात आज आदिवासी समाजाचा अभूतपूर्व जनआक्रोश उसळला. “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं!” अशा घोषणांनी संपूर्ण पालघर शहर दणाणून गेलं. आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘जन आक्रोश विशाल मोर्चा’ मध्ये जिल्हाभरातील लाखो आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवला.
१४ ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक, पालघर चाररस्ता परिसरात आदिवासी बांधव, महिला, युवक, विद्यार्थी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, नृत्य आणि घोषणांच्या आरोळ्यांमध्ये मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला.
“बंजारा-धनगर हटाओ, आदिवासी आरक्षण बचाओ!”, “हम हमारा हक मांगते, किसीसे भिख नहीं मांगते!”, “बिरसा मुंडा करे ऊलगुलान – ऊलगुलान!” या घोषणांनी वातावरण भारले होते. मोर्चात काही युवकांनी नुकत्याच प्रदर्शित कांतारा 2 चित्रपटातील आदिवासी संघर्षाची झलक सादर केली, ज्याने वातावरण अधिक उत्साही झाले.
मागण्यांचे निवेदन सादर
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या हालचालींचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
“हे पाऊल संविधानविरोधी असून आदिवासी समाजाच्या हक्कांवर थेट आघात करणारे आहे,” असे स्पष्ट शब्दांत नमूद करण्यात आले.
आमदार विलास तरे यांची ठाम भूमिका
मोर्चानंतर झालेल्या सभेत आमदार विलास तरे यांनी सरकारला थेट इशारा दिला.
> “आदिवासी आरक्षण हा आमचा संविधानिक हक्क आहे. बंजारा आणि धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश हा असंवैधानिक प्रयत्न आहे. आमच्या हक्कांवर कुणाचाही डाका चालणार नाही. गरज पडल्यास आम्ही आमदारकीचा राजीनामाही देऊ!”
तसेच त्यांनी स्पष्ट केलं की,
> “आदिवासी समाजाचा संघर्ष केवळ आरक्षणापुरता नाही, तर आपली ओळख, संस्कृती आणि अस्तित्व यासाठी आहे. ‘संविधानाचा सन्मान करा, आदिवासींचा अधिकार राखा’ — हेच आमचं ब्रीद आहे.”
आंदोलनाला सांस्कृतिक स्वरूप
सभेत इतर वक्त्यांनी “आदिवासी संस्कृती टिकवा, तरच आरक्षण टिकेल!” असा संदेश देत समाजात एकतेचं आवाहन केलं.
मोर्चात विविध आदिवासी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटना आणि राजकीय नेत्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
पारंपरिक वेशभूषा, आदिवासी नृत्य, आणि घोषणांच्या गजरात पालघर शहराने आज एकजुटीचा संदेश दिला.
सभेचा समारोप “जय जोहार! जय आदिवासी!” या घोषणांनी झाला. आंदोलन शांततेत पार पडले असले, तरी त्याचा प्रभाव मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
उपस्थित मान्यवर
या वेळी पालघर खासदार डॉ. हेमंत सावरा, पालघर विधानसभा आमदार राजेंद्र गावित, विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये, माजी खासदार बळीराम जाधव, वैदही वाढाण, जगदीश धोडी, रमेश सवरा, विराज गडग, संतोष बुकले, अशोक शिंगाडा, प्रसाद पऱ्हाड, प्रतिभा गुरोडा, सुनील पऱ्हाड, दत्ताराम करबट, किर्ती वरठा, मीना धोदडे , अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी पत्रकार सत्येंद्र मातेरा , नितीन बोंबाडे निलेश कासट व आदींसह अनेक आदिवासी नेते उपस्थित होते.
तसेच विविध यूट्यूबर्स आणि स्थानिक पत्रकार यांनीही आंदोलनाचे थेट कव्हरेज केले.
आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या प्रमुख मागण्या
1️⃣ बंजारा व धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये.
2️⃣ आदिवासी ते बिगर आदिवासी जमीन हस्तांतरणास विरोध.
3️⃣ बोगस जातवैधता प्रमाणपत्रे रद्द करावीत.
4️⃣ पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.
5️⃣ जिल्हा परिषदेच्या सभागृहाला निसर्गवासी काळुराम काकड्या धोदडे (काका) यांचे नाव देण्यात यावे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/
-


Post a Comment