लोकनेता न्युज नेटवर्क
देगलूर (अमोल कुमार शिंदे) :- ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांची खूप मोठी नुकसानी झाली. खरीप पिकांसोबतच शेतकऱ्यांच्या शेतातील माती सुद्धा वाहून गेली. शेतकऱ्यांच्या आक्रोशानंतर शासनाने मदत निधीची खूप मोठी घोषणा केली खरी परंतु आजतागायत हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही नुकसान भरपाईची मदत पडली नाही. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू म्हणून वल्गना करणाऱ्या सरकारी धोरणांचा निषेध करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या मार्गदर्शनानुसार,काँग्रेसचे नेते अमित देशमुख,खासदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव तथा देगलूर बिलोली विधानसभेचे पक्ष निरीक्षक डॉ. दिनेश नवगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देगलूर तहसील कार्यालयावर चटणी भाकर खावो आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे प्रास्ताविक करताना काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे कावळगावकर यांनी देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांची झालेली नुकसानी व मिळालेली तुटपुंजी मदत व शेतकऱ्यांच्या मनातील संतप्त भावना पक्ष निरीक्षकांसमोर मांडल्या. तालुकाध्यक्ष श्वेताताई बसवराज पाटील यांनीही याप्रसंगी राज्य सरकारच्या शेतीविरोधी धोरणांवर परखडपणे टीका केली. डॉ. दिनेश नवगिरे यांनी सध्याचे राज्य व केंद्रातील सरकार हे शेतकरी व गोरगरीब जनतेच्या विरोधातील सरकार असून नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांवर या सरकारने खूप मोठा अन्याय केल्याची खंत व्यक्त केली. अशा कठीण प्रसंगी काँग्रेस पक्ष सदैव शेतकरी व गोरगरिबांच्या पाठीशी भक्कम उभे असल्याचा विश्वासही याप्रसंगी दिला.
चटणी भाकर खावो आंदोलनाच्या पूर्वी पक्षनिरीक्षकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनांची आढावा बैठक ही यशस्वीपणे पार पाडली. याप्रसंगी काँग्रेस किसान आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष रामानंद जाधव, देगलूर तालुकाध्यक्ष श्वेताताई बसवराज पाटील, शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, निवृत्ती कांबळे सांगवीकर, माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार,जिल्हा उपाध्यक्ष शरीफ मामू, बालाजी थडके ,सुभाष अल्लापुरकर, जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे कावळगावकर, प्रा. उत्तमकुमार कांबळे, सय्यद सर, प्रा. सिकंदर देसाई, माजी नगरसेवक शेख मीरामोईद्दीन, महिला आघाडीचे अध्यक्ष नंदाताई देशमुख, आम्रपाली येसगे, युवक अध्यक्ष व्यंकट पाटील झरीकर, माजी जि.प. सदस्य दिलीप बंदखडके, डॉ. धुमाळे, सोशल मिडीयाचे संयोजक सतिष पाटील, राजू जाधव लच्छनकर, डॉ. मिलिंद शिकारे, अँड अशोक कापसे, विष्णू पाटील शेकापूरकर, जीवन पाटील देगावकर, अजय वानखेडे, माधव पाटील शेळगावकर, मलरेड्डी यालावार, व्यंकट पाटील नरंगलकर, मनोहर देगावकर, हाफिजखान पठाण, शेषेराव येलबुगडे, प्रकाश काळे, अँड. अंकुश जाधव, शंकर जाधव हळीकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment